'आता 4 जूननंतर भाजप आणि..'; शरद पवारांना 'भटकती आत्मा' म्हणणाऱ्या मोदींना रोहित पवारांचं उत्तर

Modi Called Sharad Pawar As Bhatakti Aatma Rohit Pawar React: शरद पवारांचा उल्लेख 'भटकती आत्मा' असा करत मोदींनी राज्याचं राजकारण अस्थिर करण्याचं काम एका ज्येष्ठ नेत्याने केल्याचं विधान पुण्यातील सभेत केलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 30, 2024, 08:44 AM IST
'आता 4 जूननंतर भाजप आणि..'; शरद पवारांना 'भटकती आत्मा' म्हणणाऱ्या मोदींना रोहित पवारांचं उत्तर title=
रोहित पवारांनी सोशल मीडियावरुन नोंदवलं मत

Modi Called Sharad Pawar As Bhatakti Aatma Rohit Pawar React: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी पुण्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. शरद पवारांचा उल्लेख 'भटकती आत्मा' असा करत मोदींनी राज्याचं राजकारण अस्थिर करण्याचं काम एका ज्येष्ठ नेत्याने केल्याचं विधान केलं. शरद पवारांवर मोदींनी केलेल्या या टीकेला पवारांचे नातू आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर या टीकेवरुन आपली प्रतिक्रिया नोंदवली आङे.

मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान मोदींनी पुण्यातील भाषणामध्ये शरद पवारांवर निशाणा साधला. "महाराष्ट्राने दिर्घकाळ राजकीय अस्थिरतेचा काळ पाहिला आहे. मी जे बोलतोय ते कोणी व्यक्तिगत घेऊ नका. आमच्याकडे म्हणतात काही भटकत्या आत्मा असतात. ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, ज्यांची स्वप्नं पूर्ण होत नाहीत त्या आत्मा भटकत राहतात. स्वत:चं नाही झालं तर इतरांचं बिघडवण्यात त्यांना मजा येते. आपला महाराष्ट्रही अशा भटकत्या आत्म्यांना बळी पडला आहे. 45 वर्षांआधी येथील एका मोठ्या नेत्याने आपल्या महत्त्वकांक्षेसाठी या खेळाची सुरुवात केली," असं म्हणत मोदींनी थेट उल्लेख न करता शरद पवारांवर निशाणा साधला. "तेव्हापासून (मागील 45 वर्षांपासून) महाराष्ट्रात अस्थिरतेचं राजकारण सुरु आहे. अनेक मुख्यमंत्री आपला कार्यकाळ पूर्ण करु शकले नाहीत. ही आत्मा काहीही करते. विरोधकांनाही तिने अस्थिर केलं आहे. ही आत्मा आपल्या पक्षाला आणि कुटुंबालाही अस्थिर केलं आहे. 1995 महायुती सरकारवेळीही या आत्माने सरकारला अस्थिरत करण्याचा प्रयत्न केला," असंही मोदी म्हणाले.

विधानसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवारांच्या पुढाकाराने महाविकास आघाडीची स्थापना झाल्याचा संदर्भ देतही मोदींनी टीका केली. "2019 मध्ये जनादेश धुडकावत जनादेशाचा एवढा अपमान केला ते महाराष्ट्राच्या जनतेला ठाऊक आहे. आज महाराष्ट्रातील भटकत्या आत्म्याचं समधान होत नाही तर देशभरात अस्थिरता निर्माण करण्याचा खेळ चालवला आहे. आज भारताला अशा भटकत्या आत्म्यांपासून वाचवण्यासाठी देशाला स्थिर आणि मजबूत सरकारच्या दिशेने वाटचाल करणं गरजेचं आहे," असं मोदी म्हणाले.

नक्की वाचा >> 'निर्लज्ज', 'डोके फिरलं', 'स्वकर्तृत्व शून्य' म्हणत ठाकरेंचा अजित पवारांवर घणाघात; म्हणाले, '4 जूननंतर..'

रोहित पवारांची प्रतिक्रिया

मोदींनी शरद पवारांचा 'भटकती आत्मा' असा उल्लेख केल्यावरुन रोहित पवारांनी मोदींना टोला लगावला आहे. संत एकनाथ महाराजांच्या 'काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल! नांदतो केवळ पांडुरंग!' या ओळीचा उल्लेख करत रोहित पवारांनी निशाणा साधला आहे. "मोदीजी महाराष्ट्र हे आमचं शरीर म्हणजेच पंढरी आहे आणि विठ्ठल हा या पंढरीतला आत्मा आहे. म्हणूनच स्वतःचं आसन अस्थिर झाल्याचं लक्षात येताच तुम्हाला महाराष्ट्राची आठवण झाली, पण इथं येऊन विठ्ठलाचं दर्शन घेण्याऐवजी तुम्हाला अस्थिर आत्मे दिसू लागले. आता 4 जूननंतर भाजप आणि मित्र पक्षांच्या अनेकांना निवांत हिमालयात जाऊन मन स्थिर करण्याची संधी देश देणार आहे. तोपर्यंत काळजी घ्या," असं रोहित पवारांनी आपल्या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन म्हटलं आहे.

आज मोदींच्या 3 सभा

पंतप्रधान मोदी माळशिरस, धाराशिव आणि लातूरमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. माढामधील उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी माळशिरस येथे दुपारी पावणेबारा वाजता प्रचारसभा घेतील. त्यानंतर पंतप्रधान मोदी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी धाराशिव येथे दुपारी दीड वाजता सभा घेणार आहेत. सुधाकर श्र्गांरे यांच्या प्रचारासाठी मोदी लातुरमध्ये मंगळवारी दुपारी तीन वाजता सभा घेणार आहेत.