मुंबई- मडगाव वंदे भारतला हिरवा कंदील; आता कोकणातही सुस्साट जा!

Mumbai Goa Vande Bharat Express: मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही महाराष्ट्रातील पाचवी ट्रेन असणार आहे. या वंदे भारत ट्रेनमुळे  गोवा आणि महाराष्ट्र यांच्यातील रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारली जाणार आहे. 

सायली पाटील | Updated: Jun 27, 2023, 11:32 AM IST
मुंबई- मडगाव वंदे भारतला हिरवा कंदील; आता कोकणातही सुस्साट जा!  title=
Mumbai Goa Vande Bharat begains its first journey

सुरभि जगदीश, झी मीडिया, मडगाव:  कोकण मार्गावरून पहिली वंदे भारत रेल्वे अखेर मंगळवारी रुळावर आली. मडगाव ते सीएसएमटी (Madgaon-Mumbai Vande Bharat) असा या वंदे भारत ट्रेनचा प्रवास असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारे या ट्रेनला हिरवा झेंडला दाखवला. दरम्यान या गाडीचं उद्घाटन हे पुढे ढकलण्यात आलं होतं. बालासोरमध्ये झालेल्या ट्रेन अपघातानंतर वंदे भारत ट्रेनचं उद्धाटन पुढे ढकलण्यात आलेलं.

बालासोर रेल्वे अपघातानंतर मुंबई-गोवा सह देशभरातील पाच वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी  राणी कमलापती (भोपाळ) स्थानकांवरून हिराव झेंडा दाखवणार आहे. ज्यामध्ये राणी कमलापती (भोपाळ)-इंदौर वंदे भारत एक्सप्रेस, भोपाळ-जबलपूर वंदे भारत एक्सप्रेस, रांची-पटणा वंदे भारत एक्सप्रेस, धारवाड-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस आणि गोवा (मडगाव)-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहेत.

हेसुद्धा वाचा : मुंबई मडगाव वंदे भारत सुरु होण्याआधीच फुल्ल, गणेशोत्सवासाठी वंदे भारतच्या तिकिटांसाठी वेटिंग लिस्ट

मुंबई-गोवा वंदे भारत ही रेल्वे गाडी ३ जूनपासून सुरु होणार होती. मात्र 2 जूनला ओडीशातील बालासोर इथे तिन रेल्वे गाड्यांचा भिषण अपघात झाला. यामध्ये २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला तर हजारापेक्षा जास्त प्रवाशी जखमी झाले. या अपघातानंतर वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला होता. 

मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस

मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही महाराष्ट्रातील पाचवी ट्रेन असणार आहे. या वंदे भारत ट्रेनमुळे  गोवा आणि महाराष्ट्र यांच्यातील रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारली जाणार आहे. गोव्यातील सुंदर समुद्रकिनारे आणि नैसर्गिक दृश्‍यांचा आनंद प्रवाशांना या वंदे भारत ट्रेनमधून लुटता येणार आहे.

तीन ते चार तासांचा वेळ वाचणार

सध्या गोव्यातील मडगाव स्टेशनपासून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत सुमारे 586 किमी अंतर कापण्यासाठी 11-12 तास लागतात. हे अंतर वंदे भारत ट्रेनने अवघ्या 8 तासात कापता येत असल्याने प्रवाशांचा वेळ सुमारे ३ ते ४ तास वाचणार आहे.

कोकण रेल्वेवर मान्सून वेळापत्रक लागू झाले असून या अंतर्गत सर्वच रेल्वेगाड्यांच्या वेगावर मर्यादा आल्या आहेत. या शिवाय पावसाळ्यात कोकण रेल्वेवर दरडी कोसळण्याचा घटना सुरु असते. या शिवाय दृष्यमानताही कमी होते.अशा परिस्थितीत वंदे भारत या सेमी स्पीड रेल्वेगाडीचा मर्यादा येणार आहे.

वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची वैशिष्ट्ये 

- आकर्षक इंटीरियर,
- टच-फ्री वैशिष्ट्यांसह बायो-व्हॅक्यूम टॉयलेट
- डिफ्यूज्ड एलईडी लाइटिंग
- प्रत्येक सीटखाली चार्जिंग पॉइंट्स
- रिडींग लाइट 
- 160 किमी प्रतितास वेगाने धावण्याची क्षमता
- दोन ड्रायव्हर कॅब कोच
- अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे
- ट्रेनमध्ये ऑन-बोर्ड वाय-फाय इन्फोटेनमेंट
 - जीपीएस आधारित प्रवासी माहिती प्रणाली
- स्वयं-चालित सेमी-हाय स्पीड ट्रेन सेट आहे. 
- ट्रेनची स्टेनलेस स्टील कार बॉडी 
-आरामदायी आसन व्यवस्था असलेले 8 चेअर कार कोच
- प्रत्येक कोचमध्ये 32  इंची स्क्रीन
- प्रत्येक डब्यात मिनी पॅन्ट्री सुविधा
 - एक्झिक्युटिव्ह कोचमध्ये 180 डिग्री स्विव्हल सीट
-इमर्जन्सी अलार्म बटण  

मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक ( Mumbai Goa Vande Bharat Express Time Table)

Non Monsoon वेळापत्रक -
22229/ 22230 मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस (आठवड्याचे ६ दिवस) शुक्रवार वगळता.

22229 सीएसएमटी मुंबईहून 05.25 वाजता निघेल आणि मडगावला दुपारी 1.10 वाजता पोहोचेल.

22230 मडगावहून दुपारी 2.40 वाजता निघेल आणि रात्री 10.25 वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल.

Monsoon वेळापत्रक -

22229/22230 मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस (त्री-साप्ताहिक)

22229 दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी 5.25 वाजता सीएसएमटी मुंबईहून निघेल आणि मडगावला दुपारी 3.30 वाजता पोहोचेल.

22230 मडगावहून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी दुपारी  12.20 वाजता सुटेल आणि रात्री 10.25 वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल. ही ट्रेन दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम या स्थानकांवर थांबेल अन्य कोणत्याही स्थानकावर थांबणार नाही. 

या ट्रेननं प्रवास करण्यासाठी तुम्हाला चेअर कारसाठी अंदाजे 1580 रुपये, एक्झिक्युटीव चेअर कारसाठी 2870 रुपये मोजावे लागतील.